बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

जातिवादी विंचू

जातिवादी विंचू

समतेचा दगड हाताळतांना
त्या खाली दडलेल्या
जातिवादी विंचवाने मला डंक मारला
कदाचित ते त्याला पसंद पडले नसावे ?
त्याच्या डंकाने प्रचंड वेदना होत होत्या.
त्या वेदनेच्या अतिसाराने मी विवळत होतो.
त्याचे विष हळूहळू वर चढत होते
तशी वेदना तिच्या कह्यात मला आलिंगत होती.
शरीरात चढ़णाऱ्या विषाला ताबडतोब वैद्याचा उतारा  हवा होता.
नाहीतर ते विष माझ्या मेंदूवर अतिक्रमण करणार, हे नक्कीच होते .
मी धावत धावत वैद्याकडे गेलो.
वैद्यानी मात्र डाव साधला
जुने  वैर आठवून त्याने मंत्र उलटा मारला.
त्यांनी झाले असे,
त्या जातिवादी विंचवाचे विष वरवर चढतच गेले.
आता विष माझ्या नसानसात तांडव करीत होते.
मेंदूवर तर त्यांनी कधीच ताबा मिळवला होता.
मीही त्या जातिवादी विंचवाची एक प्रजात बनलो.
आता मीही चावतोय घराघरात घुसून प्रत्येक माणसांना.

संजय बनसोडे 9819444028

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

वासनेची क्ष किरणे

तुझ्या निरागस शरीराच्या आरपार
मी घुसवली,
माझ्या वासनेची  "क्ष" किरणे.

स्वप्नाच्या घोड्यावर बसून,
हैदोस घालतोय
तुझ्या रोमारोमात.

तु मात्र फिरतेस माझ्यासोबत
मनसोक्त,बेफिक्र
खांद्याला खांदा लावून.

पण, माझ्यातला शैतान जागा होवून
कधी माझ्या मनाच्या नियंत्रणावर कुरघोडी करेल
हे मलाच माहीत नाही.

मी जरी तुझ्यासाठी जिवा भावाचा मित्र असलो..?
शेवटी आहे माणूसच....
वासनेच्या गटारात माखलेला.

तु मात्र एकेक पाऊल सावधपणे टाक.
कारण,
हे वासनाधीन कुत्री टपुनच बसली,
तुझे लचके तोडायला.

*संजय बनसोडे*

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

अन्नाची नासाडी थांबवा


काल महापरिनिर्वाण दिनांनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, खेड्यापाड्यातून आंबेडकरी गोरगरीब जनता महामानवाला अभिवादन करण्यासाठी आली होती.त्यांच्या सोयीसाठी अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी,पक्षांनी,कार्यकर्त्यानी मुम्बईतल्या छोट्यामोठ्या संस्थांनी  अन्नदान वाटप केले. त्या सर्व कंपन्याचे, संस्थेचे,पक्षांचे सर्वप्रथम अभिनंदन.
अन्नदान वाटप होत असतांना मला  एका गोष्टीचे फार वाईट वाटत होते.आपल्या जनतेकडून मला  प्रचंड प्रमाणात अन्नांची नासाडी होतांना दिसली.
एका संस्थेचा टेंपो आला.त्यांनी पोहे आणले.सर्वांनी रांगा लावून पोहे घेतले आणि खाऊ लागले,तोच दुसऱ्या संस्थेचा टेंपो आला त्यांनी वाटप करण्यासाठी खिचडी आणली. पोहे खात असणारी जनता अर्धे पोहे तसेच  सोडून पुन्हा खिचडीच्या रांगेला लागली. ते पोहे मात्र तसेच त्या प्लेट मधे पडलेले.त्यावर कुणी पाय देऊन जात होते कुणी ओलांडून जात होते.तिसरा टेंपो पूरी भाजीचा आला.
काही बहाद्दर असे होते,त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की, हे फक्त येथे खाण्यासाठीच आले काय ?
शिवाजी पार्क मैदानात हे असेच चित्र अनुभवायला  मिळाले.
जेंव्हा चार वाजता पुन्हा मी तिथे गेलो, तर जिथे अन्नदान वाटप होत होते ती जमीन अन्नाने माखून गेली होती.
मित्रांनो, तुमच्यासाठी स्थानिक संस्था अन्नदान वाटप करतात.कारण, आपण खूप लांबून बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी मुम्बईत येत असता. त्यांची मेहनत पैसा खर्च करून  ते तुमच्यासाठी अन्न आणतात .त्या अन्नांची नासाडी तुम्हांला योग्य वाटते का ?
आपण आपल्या घरात एक भाताचे शीत तरी वाया जावू देतो का ?
मंग येथे का अन्नांची नासाडी ?
पुढच्या वेळी स्थानिक संघटनेने याकडे लक्ष देऊन हा प्रकार थांबवला पाहिजे.
संजय बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...