सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

डॉ बाबासाहेब आंबेडकर

"डॉ बाबासाहेब आंबेडकर " एक न मावळणारा सूर्य. एक न शमणारं वादळ.एक मूर्तिमंत बंड चातुर्वर्णाच्या चीरेबंदी भिंतींना तेजाने कडाडून हादरा देणारी तेजस्वी वीज.
हजारो वर्षे हिंदू समाजाने लाथाडलेल्या अस्पृश्य समाजाला जागे करुन त्यांच्या गोठलेल्या रक्तात ज्वालामुखीच्या लाव्हा ओतून प्रस्थापित समाजा विरोधात बंड करायला लावणारी एक महान विभूति. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जेवढे लिहावे जेवढे वाचावे तेवढे कमीच. बाबासाहेबांचे विचार व लेखणी  त्या अथांग महासागरासारखी विशाल आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर जुलमी सत्तेविरूद्ध आणि ढोंगी विषमतेविरुद्ध लढत राहिले. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षाही त्यांना अस्पृश्य वर्गाचे स्वातंत्र्य महत्वाचे वाटत होते. देशाला स्वतंत्र मिळाल्या नंतरही जर अस्पृश्य समाज असाच गुलामीच्या खाइत खितपत पडलेला असेल तर मिळालेले स्वातंत्र्य भांडवलदार आणि स्पृश्य समाज हस्तगत करतील आणि अस्पृश्य समाज आणखी खोल खाइत ढकलल्या जाईल ही त्यांना भीती होती. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्या अगोदर अस्पृश्य समाजाला स्वातंत्र्य मिळणे खूप गरजेचे आहे असे त्यांना वाटत होते.
हे आंदोलन करतांना सतत बाबासाहेबांना हिंदूच्या छळाला व अपमानाला सामोरे जावे लागले. स्पृश्य हिंदू बाबासाहेबांना इंग्रजाचे हस्तक आणि हिंदूचे दुश्मन समजून त्यांच्यावर हल्ला चढवत. पण बाबासाहेब त्यांनी केलेल्या टिकेची व विटंबनेने थोडेही न डगमगता आपले आंदोलन सतत चालूच ठेवले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मूर्तिपूजक नव्हते तर त्या मूर्त्या फोडून टाकण्यावर त्यांचा विश्वास होता.परंतु हजारो वर्षापासून आपल्या देशाला धर्मातल्या महापुरुषाना देवत्व बहाल करुन पूजन्याची सवयच जडली होती, त्यांची शिकवण चांगली असो या वाईट पण त्यांचे एक ना एक वाक्य त्यांच्या भक्तांसाठी सर आँखों पर असे. जर त्यांच्या महापुरुषाविरुद्ध कुणी जात असेल, त्यांनी सांगितलेले चूक ठरवत असेल तर त्यांना त्या महापुरुषाच्या भक्ताकडून छळ,कपट,शिव्यागाळ यांना सामोरे जावे लागत असे.अशा भयमय वातावरणात कुणी विरोधक तग धरून रहात  नसे.एक तर तो त्याला शरण जात असे नाहीतर मैदान सोडून पळून जात असे.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर याला अपवाद होते. आंबेडकर नावाचा हा विद्रोहाचा दिवा तूफ़ान वादळात ही जळणारा आणि पाण्यात ही पेटणारा होता.वादळ वाऱ्यासारखा दुश्मनाने त्यांच्या भोवती कितीही गोंगाट घातला तरी विजेसारखा कडाडून ते आपल्या तेजस्वी ज्ञानाचे दर्शन घडवित असत. त्या काळात धर्माने  देवत्व बहाल केलेली मूर्ती  म्हणजे  महात्मा गांधी , या मूर्तीला  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धारधार लेखणीला हातोडा करुन फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून बाबासाहेबांना त्यांचे भक्त व  स्पृश्य हिंदू  देशद्रोही व इंग्रजाचा हस्तक म्हणत. बाबासाहेबांच्या अभ्यासक टीकेला उत्तर देण्यास सहसा कुणी धजावत नसे. बाबासाहेबांच्या भेदक माराने दुश्मन नुसते तडफडत असत,कारण त्यांना प्रतीउत्तर देणे जमत नसे.त्यांच्या दुश्मनालाही बाबासाहेबांचे विशाल बौद्धिक सामर्थ्य माहीत असल्यामुळे ते त्यांच्या टिकेला प्रतीउत्तर न देता त्यांना शिव्या देण्यातच धन्यता मानीत.
बाबासाहेब अखंड भारताचे स्वप्न उराशी बाळगून देशाला एकसंध करण्यासाठीच धरपडत राहिले.प्रांताच्या संस्कृतीशी ते कधीच चीटकून राहिले नाही.अखंड भारत देशातच आपले कल्याण आहे. असे ते नेहमी सांगत.एक देश,एक भाषा,एक संस्कृती हा महामंत्र ते नेहमी जपत. ते एकदा  सभेला संबोधित करतांना म्हणाले, प्रांतिक भाषेची मागाहून व्यवस्था होऊ शकते पण आधी देशाला एका भाषेत बोलायला शिकवा आणि बघा काय चमत्कार होतो.
हिंदू समाज बाबासाहेबांना त्या काळी हिंदू धर्माचा कट्टर शत्रु मानत होता. बाबासाहेब नेहमी हिंदुतील अनिष्ट रुढी परंपरा विरोधात टीका करत असत त्यांनी हिंदू धर्माचा मनुस्मृती हा ग्रंथ रायगडच्या पायथ्याशी जाळला तेंव्हापासून तर हा द्वेष आणखी वाढत गेला.परंतु बाबासाहेब हे हिंदू धर्माचे शत्रु नसून मित्र होते हे काही हिंदूंना आजपर्यंतही समजले नाही.बाबासाहेबांना हिंदू धर्मातला चातुर्वर्ण नाहीसा करुन,त्यातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करून  हिंदू धर्म मानव कल्याणासाठी परिपूर्ण करायचा होता. ते आपल्या भाषणात सांगत, हिंदू धर्मातून चातुर्वर्ण नाहीसा करून हिंदू धर्माची रचना समतेच्या आणि लोक हिताच्या पायावर उभी करा. पण हे हिंदू धर्माचे ठेकेदार बाबासाहेबांचे (एका शूद्राचे) ऐकतील ते हिंदू कसले ?
बाबासाहेबांना हिंदू समाजाचा सूड घ्यायचा नव्हता.जर त्यांना सूड घ्यायचा असता तर त्यांनी या मातीतला आणि आपल्या पूर्वजांचा धर्म स्वीकारण्या पेक्षा परकीयांचा धर्म स्वीकारून त्यांच्यावर सूड उगवला असता. ते एकदा म्हणाले होते,मी आणि माझे अनुयायी जर मुसलमान झालो असतो तर कोट्यवधी रुपये आमच्या समाजाच्या पायावर ओतल्या गेले असते.माझ्या मनात जर असा सूड आणि द्वेष असता तर  मी पाच वर्षाच्या आत या देशाचे वाटोळे केले असते.पण मी या देशाचा आणि हिंदूंचा दुश्मन नसून एक सच्चा देशप्रेमी आहे हे आज ना उद्या देशाला कळेलच. आणि खरच बाबासाहेबांनी देशाची घटना लिहून ते एक सच्चे देशभक्त आणि राष्ट्रनिर्माते आहेत याचा देशाला पुरावा दिला.

भीम लेखणी विचारपीठ
संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...