सोमवार, २४ ऑक्टोबर, २०१६

गरीब आणि श्रीमंत



एका गरीबाच्या झोपडीत सायंकाळचे  सात वाजले की एका छोट्याशा देवळीत एक रॉकेलच्या तेलाचा दिवा पेटतो.
दिवसभर काबाड़ कष्ट करणारे, उन्हा तान्हात कधी भाकरीविना कधी पाण्याविना राब राब राबणारे ते दोन जीव त्या छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात विसावा घेतात.दिवसभर घामाने,मातीने माखलेले ते त्यांचे शरीर त्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशात मंत्रमुग्ध होउन दगडाच्या भिंतीला टेका देऊन शांत पडते.
दिवसभर भर उन्हात लोखंडाच्या  टिकासी,पहारीने दगड मातीचे काम करणाऱ्या त्या पोटाची भूक आपल्या पेक्षा न्यारीच. खरी भूक म्हणजे काय त्या पोटाला विचारावी !
                         दिवसभर AC च्या थंड्या हवेखाली व नरम गादीच्या खुर्चीवर  बसून चार वेळा चहा पिऊन दुपारचे भरपेट जेवण व मधेच मनात आले त्याची चव चाखणारे ते श्रीमंतांचे पोट, जेंव्हा तो रात्री DINNER ला डाइनिंग टेबलवर बसतो, तेंव्हा त्याच्या मनाला एक प्रश्न पडतो, आज आपण काय खायायचे अन् का खायायचे ? 
कारण ज्या पोटाला भूक या शब्दाचा अर्थच कळत नाही ते पोट फक्त DINNER या नावासाठी पोटात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करते.दहा दहा बल्ब असणाऱ्या त्या घरातल्या वेक्तीला काय माहीत अंधार म्हणजे काय ?खरतर त्या वेक्तीचे घर कितीही प्रकाशमय असले तरी त्याच्या जीवनात अंधारच असतो. व त्या अंधाराला डावलन्यासाठी तो सतत पळत असतो ,खरा प्रकाश शोधायला, खरे जीवन शोधायला !
             त्या झोपडीतील ते दोन जीव मात्र आपली पोटाची आग विझवन्यासाठी चुलीत लाकडे घालून  आग लावतात व त्याच्यात आपल्या पोटाच्या आगीला थंड करणारे  अन्न, वरण भात बनवून जर्मनच्या ताटात आनंदात वरपतात. आणि रात्रीचे 8: 30/9: 00 वाजता आपल्या झोपडीचे ते तुटके मूटके कवाड (दरवाजा )बंद करून ठिगळ्याच्या गोदड्यावर निवांत झोपतात . शांतपणे , ना पंखा ना  AC . गाढ झोपी गेलेले ते दोन जीव.आणि त्या देवळीतला दिवा अगदी शांतपणे डोलत डोलत त्यांना प्रकाश देत राहतो !
         इकडे आलीशान घरामध्ये AC च्या थंडगार हवेत आलीशान बेडवर मात्र दुसऱ्या दोन जीवाला झोप येत नाही.
रात्रीचे  बारा वाजले होते तरी यांचे डोळे उघडेच होते. हे दोघेही उद्याचा विचार करत होती, जो दिवस अजून उजाडलाच नाही. त्या
दोघापैकी एक मधेच बोलला " डार्लिंग तुला काय वाटते उद्या कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे ? . . . . . . . . . "

संजय बनसोडे
http://bhimlekhani.blogspot.com

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिगामी वाटचाल

*पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिगामी वाटचाल*

महाराष्ट्रात कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या समाजाचे मोर्चे निघाले नसतील, ते आज सर्वच समाज आपआपल्या समाजाची ताकत दाखवण्यासाठी मोर्चे काढत आहे.
कोपर्डीच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मराठा मूक मोर्च्याचा  मूळ मुद्दा राहिला बाजूलाच,आणि बौद्ध व दलितांच्या संवरक्षणासाठी असलेला  *ॲट्रॉसिटी कायदा बंद करा* हिच मागणी मुख्य होऊन बसली त्यामुळे कळत न कळत बौद्ध व दलित समाजाचे या मोर्च्यांमुळे मने दुखावल्या गेली. त्यांच्यात अशांततेची भावना निर्माण झाली. एकमेका विरोधात द्वेष निर्माण होत गेला. आणि त्याचा पडसाद आपण नाशिक येथे पाहिलाही.
या अशांततेच्या भावनेतून दलित आणि बौद्ध समाजाने  ॲट्रॉसिटीच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात प्रतीमोर्चे काढायला सुरवात केली आणि त्यांना उद्देशून  *तुम भी देखो आँखों से, हम भी आये लाखो से*  असे सांगीत आम्हीही काही कमी नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकताच मनुवादाची  कीड़ झुंगारुन आंबेडकरी विचारांना आत्मसात करणारा मराठा बांधव पुन्हा आंबेडकरी विचारधारे पासून व बौद्ध बांधवा पासून  दूर लोटल्या गेला. आंबेडकर साऱ्या जाती धर्माचा म्हणणारा पुरोगामी मराठा वर्गही आज आंबेडकर फक्त बौद्ध आणि दलितांचेच आहेत त्यांनी आमच्यासाठी काय केले ?असे  म्हणू लागला. ज्या मराठा संघटनानी मोठ्या मेहनतीने मराठा समाजात फुले शाहू आंबेडकरी विचार रुजवले आज ते लयाला जातात की काय याची भीती निर्माण झाली.
औरंगाबाद विद्यापीठ नामांतरा  वेळेस बौद्ध,  मराठा वाद पेटला होता तसाच पुन्हा पेटणार की काय अशी भीती निर्माण झाली.
दलित, बौद्ध समाजावर होत असलेले अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही तोच मराठा समाज,  बौद्ध व दलितांचा  अत्याचार प्रतिबंधक कायदाच  रद्द करा अशी मागणी प्रचंड जनसमुदाय असणाऱ्या मूक मोर्चात होत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात बौद्ध,दलित वस्त्यात  भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. पण धम्मचक्र परिवर्तन दिनी मुख्यमंत्री साहेबांनी दीक्षाभूमीवरून जेंव्हा सांगितले की, दलित बांधवांना घाबरण्याचे कारण नाही. हा कायदा रद्द होणार नाही. तेंव्हा कुठे दलित व बौद्ध  समाजाच्या जीवात जीव आला. कारण, जातिवादी गावगुंड प्रत्येक गावात आहेत. हा कायदा असतांना जर एवढा  अत्याचार तर कायदा बंद झाल्यावर किती होईल ?

मूक मोर्च्याची दूसरी मागणी होती आरक्षण. आपण गावागावात  जावून सर्वे केला तर तुम्हांला समजेल की, काही बोटावर मोजण्या इतकी घरे सोडली तर मराठा समाजातल्या सर्वांनाच आरक्षणाची गरज आहे . म्हणून मराठा संघटनेचा  आरक्षण हा मुद्दा रास्त आहे हे  सर्वांनीच मान्य केले.पण कायद्याने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे कसे ? ही मोठी समस्या महाराष्ट्र सरकार पुढे आहे. सद्ध्याची आरक्षणाची स्थिती  बघता मराठा  समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यामुळे एकच पर्याय आहे, त्यांचा OBC मधे समावेश करणे. त्यानंतरच त्यांना न्यायिक मार्गाने आरक्षण मिळेल. पण OBC मधे समाविष्ट असलेल्या समाजाला भीती निर्माण झाली की महाराष्ट्रात प्रचंड मोठा असलेल्या मराठा समाजाचा जर OBC मधे समावेश झाला तर सद्ध्या आमच्या जातीला मिळत असलेले आरक्षण संकुचित होईल आणि या आरक्षणाचा फायदा फक्त मराठा समाजालाच मिळेल. त्यामुळे OBC बांधव प्रतीमोर्चे काढून सरकारला निवेदन देत आहे की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण *आमच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना ते दिले पाहिजे.* OBC समाजाचे मोर्चे बघून पुन्हा मराठा विरुद्ध OBC हा नवा वाद पेटणार की काय ?अशी भीती वाटू लागली आहे. आपआपल्या हक्कासाठी विविध समाज रस्त्यावर उतरला असतांना मुस्लिम बांधव मागे कसे राहणार. मुसलमानही आता आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढून रस्त्यावर उतरला  आहे.

सद्ध्या महाराष्ट्रात निघत असणाऱ्या मोर्च्यांने काही निष्पन्न होणार की नाही हे  माहीत नाही पण एकमेका विरोधात द्वेष मात्र नक्की निर्माण होईल. त्यामुळे मला असे वाटत आहे की, पुरोगामी झालेला महाराष्ट्र पुन्हा प्रतिगामी वाटचाल करते की काय ?

मनोगत ..............🖋
( हा लेख कुण्या मोर्चेकरांच्या भावना दुखवण्यासाठी लिहला नसून हे माझे व्यक्तीगत मत आहे )

संजय बनसोडे

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

शांत आहे निळे आकाश नका त्याला छेडू

शांत आहे निळे आकाश
नका त्याला छेडू
जर कडाडले तुमच्यावर
नका दोष देत रडू

शांत झालं निळं वादळ
नका त्याला छेळू
जर उठले सोसाट्याने
धूम ठोकीत नका पळू

शांत आहे निळा सागर
नका हसू बघून छोटी लाट
जर खवळला तुमच्यावर
क्षणात करील तुमचा नायनाट

शांत आहे निळी शाई
नका करू तिचा हेवा
जर पेटून उठली तुमच्यावर
ना भेटणार त्यावर दवा

संजय बनसोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी ?

महात्मा ज्योतीबा फुले म्हणतात हिंदू धर्मात ब्राह्मणी व्यवस्थेतील मनूच्या कायद्याने स्त्रियांना बहुजन समाजाला गुलाम केले आहे.म्हणून ती मनुस्मृती जाळली पाहिजे. अशा कठोर शब्दात महात्मा ज्योतीबा फुले मनुस्मृतीचा निषेध करतात.
म्हणुनच, आपल्या गुरूचे अधूरे राहिलेले कार्य त्यांचा अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गुरुचा गुरु छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून महात्मा ज्योतीबा फुलेचे अधूरे स्वप्न पूर्ण करतात.
पण मित्रांनो मला दुःख या गोष्टीचे वाटते, बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर साठ वर्ष उलटून ही  अजून कुणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा अनुयायी मला दिसला नाही.
आजपर्यंत आंबेडकरवादी म्हणून मिरवणारे ऐतखाऊच पैदा झालेत, पण माझ्या बापाचा खरा अनुयायी अजून पैदाच झाला नाही.वामनदादा आपल्या गीतात "पाच लोके असते तर ....."म्हणाले होते. पाच तर दुरच, एक जरी पैदा झाला असता तर हा सारा भारत बौद्धमय झाला असता.
पण आंबेडकरवादी नावाचा बूरखा घालून मिरवणारे हे बेईमानडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पोट कसे भरेल यातच दंग आहेत.
गावकूसाबाहेरचा वीस पंचवीस घराचा बौद्धवाडा त्यांच्यातही तीन तीन पार्ट्या, हा त्यांच्या जयंतीत जात नाही तो यांच्या जयंतीत येत नाही. त्यांच्यातही अध्यक्ष पदावरून भांडणे. साले असतात अंगूठा छाप, पद मात्र अध्यक्षाचेच हवे. काय खाक भीमकार्य होईल या गाढवाकडून !
शहरातही तिच दशा, जो उच्चवर्णीय व्यापार धंद्यावाला आंबेडकरी समाजाला आंबेडकराला अजूनही तुच्छ लेखतात त्यांनाच जयंतीची पावती देऊन भीक मागतात आणि  ऑर्केस्ट्राच्या नावाने बाया नाचवतात, उरलेले पैसे खिशात घालून एक वर्ष विहाराकडे आणि बाबासाहेबांच्या कार्याकडे ढुंकूनही बघत नाहीत.
पण आजच्या नवतरुणांनी अशा मूर्खापासून दुरच राहिले पाहिजे, तरच समाजपरिवर्तन होईल अन्यथा जसा भटांनी धंद्यासाठी  देव उभा केला तसेच बाबासाहेबांच्या नावाने त्यांच्या  गरीब जनतेला लुबाडून हे बाबासाहेबांच्या नावावर धंदा केल्याशिवाय राहणार नाहीत.

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

शांत आहे निळे आकाश नका त्याला छेडू

शांत आहे निळे आकाश
नका त्याला छेडू
जर कडाडले तुमच्यावर
नका दोष देत रडू

शांत झालं निळं वादळ
नका त्याला छेळू
जर उठले सोसाट्याने
धूम ठोकीत नका पळू

शांत आहे निळा सागर
नका हसू बघून छोटी लाट
जर खवळला तुमच्यावर
क्षणात करील तुमचा नायनाट

शांत आहे निळी शाई
नका करू तिचा हेवा
जर पेटून उठली तुमच्यावर
ना भेटणार त्यावर दवा

संजय बनसोडे

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

धम्मचक्र परिवर्तन दिनांनिमित्त घेतलेल्या लेखन स्पर्धेचे विजेते जाहीर

*धम्मचक्र परिवर्तन दिनांनिमित्त भीम लेखणी विचारपीठवर घेतलेल्या लेखनस्पर्धेचा निकाल जाहीर*

निकाल जाहीर व्हायला थोडा अवधी लागला त्याबद्दल क्षमस्व 🙏🏻

दिनांक 11/10/ 2016 रोजी भीम लेखणी विचारपीठवर धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त लेखनस्पर्धा  घेतली होती.
विषय होता *आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो का ?*
या स्पर्धेत सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला.त्याबद्दल सर्वांचे आभार. खरे तर सर्व  स्पर्धकांनी वेळात वेळ काढून अत्यंत मेहनतीने या विषयावर त्यांच्या विचारांची मांडणी केली. त्यामुळे कोण प्रथम आणि कोण द्वितीय हा विषय महत्वाचा नसून आपण हाती घेतलेली भीम विचारांची लेखणी महत्वाची आहे.

आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो का ? या विषयांवर लिहताना संघरत्न घनघाव म्हणतात,
आपल्याला आज बौद्ध धम्माच्या पंगतीत बसून साठ वर्षे झाले.हा साठ वर्षाचा प्रवास,खरोखरच आपण बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार केला असता तर आज आपल्याला आपल्या धम्म बांधवाचे असे समाजप्रबोधन करायला लागले नसते आणि आतपर्यंत आपल्या समाजातून हिंदू चालीरीतीचा पगडा पूर्णपणे संपलेला असता.पण तसे प्रत्यक्षात झाले नाही आणि धर्मांतर होऊन साठ वर्षानंतरही आजचे बौद्ध, धम्मा विषयी तळ्यात मळ्यात आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानवादी धम्म दिला पण आपण त्यात चुकीच्या चालीरीती घुसवत आहोत. आजही आपल्यात मूल जन्मास आले तर आपण, त्या स्त्रीची ओटी भरणे,पाचवी,बारवी,बारसे करणे, काळे दोरे गंडे बांधणे, काळा टीक्का लावणे इत्यांदी आजही हिंदू चालीरीतीच आपण वापरतो.
हिंदू धर्मीय सत्यनारायण घालून वास्तू शांती करतात आणि आपण गृह प्रवेश, यात फरक काय ? आपण फक्त विधीचे पर्याय बदलले.
आपल्यात धम्मचक्र परिवर्तन दिनांनिमित्तही वाद आहेत की तो हिंदूच्या  तिथीला करायचा की इंग्रजी कॅलेंडर नुसार ?
या सर्व विषयावरून संघरत्न घनघाव सरांचे म्हणणे हेच आहे की, आपण फक्त बौद्ध धम्म स्वीकारला पण आत्मसात केला नाही.

सुकेशनी विमल दिगंबर कदम ताई लिहतात,
बाबासाहेबांनी फक्त धर्मांतरच केले नाही तर त्या धर्मांतरच्या कित्येक वर्षे अगोदर सिंह गर्जना केली होती की, मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मुळीच मरणार नाही. का केली ही सिंह गर्जना ? कारण बाबासाहेबांना फक्त धर्मांतरच करायचे नव्हते तर वर्षानुवर्ष चालत आलेल्या अन्यायकारक प्रथांना व वर्णव्यवस्थेला फाटा द्यायचा होता.वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी परंपरा समजातून काढून फेकून द्यायच्या होत्या. म्हणूनच त्यांनी ही सिंह गर्जना केली होती.बाबासाहेबांनी सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर, बौद्ध धम्म आपल्याला बहाल केला जेणेकरून त्या धम्मात  माझे बांधव माणूस म्हणून संचार करतील. पण आपण बौद्ध धम्माचे पालन न करता त्या बौद्ध धम्माची राखरांगोळी केली. स्वतःला बौद्ध म्हणणाऱ्या आणि हिंदू धर्मांचे ढासुन पालन करणाऱ्या  काही त्यांनी  मैत्रिणीचे उदाहरण दिले. नवरात्रीत एक बौद्ध असलेली मैत्रीण नवनवीन साड्या घालून भाग घेत होती तर दूसरी मैत्रीण चक्क बिना चप्पलची फिरत होती त्यांनी त्या मैत्रिणीला विचारले असता तिने सांगितले की, माझ्या  सासरी  फक्त उपवासच धरतात माझ्या माहेरी तर गणपती ही बसवतात. हे सारे ऐकून ताईला हसावं की रडावं हेच कळत नव्हते कारण, 22 प्रतिज्ञेची आणि बौद्ध धम्माची त्यांनी  वाट लावली होती. रागाने ताईनी शेवटी त्यांना पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला.
खरे तर बौद्ध धम्मात अशा लोकांची फार दयनीय  अवस्था झाली.धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. गाढवाला सोन्याचा जरी महाल बांधून दिला तरी ते गटारातच लोळण्यात धन्यता मानतात. अशीच काही अवस्था ह्या लोकांची झाली जे बौद्ध आहेत पण बौद्ध धम्माचे पालन करीत नाहीत.हा दिवस पाहण्यासाठी बाबासाहेबांनी आपले धम्मपरिवर्तन केले का ? .पण या गाढवाना कसे कळेल ?
मी खूप रागीट आहे.असे माझ्या कुंडलीतच लिहले असेही म्हणणारे ही खूप बौद्ध आहेत.हे असली लोकं पाहिली की वाटतं उगाच खटाटोप करून  बाबांनी यांना बौद्ध धम्म दिला. काही बोटावर मोजता  येणारी माणसं सोडली तर बाकीच्यांची लायकी आहे का ?
सुकेशनी ताईच्या लेखावरूनही असेच वाटते की आपण ते बौद्ध अजून बनलो नाही जे बाबासाहेब  आपल्याला बनवण्याचा प्रयत्न करीत होते.

विश्वनाथ साठे सर आपल्या लेखात लिहतात,

साठे सरांनी आपल्या लेखात बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा पैकी  14-15-16-17-18 ह्या प्रतिज्ञावर सखोल चर्चा केली.
14-मी चोरी करणार नाही.
15-मी व्यभिचार करणार नाही
16-मी खोटे बोलणार नाही
17-मी दारू पिणार नाही
18-प्रज्ञा शील करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन व्यथित करीन.
खरे तर आपण 22 प्रतिज्ञा पैकी ह्या 5 प्रतिज्ञा आत्मसात कराव्या हा विचार आपल्या मनाला शिवत सुध्दा नाही.पण साठे सर म्हणतात की,  आपण आजवर सतरा प्रतिज्ञा पाळत आलो आहे पण खऱ्या दैनंदिन जीवनात अनुसरण्याच्या ह्याच प्रतिज्ञा आहेत ज्या तुम्हांला खरा माणूस बनण्यात मदत करतील.जो धर्म माणसाला माणुसकीचे वर्तन शिकवते तोच आमचा धर्म आणि हीच माणुसकी बुद्धानी कैक वर्षापूर्वी अनुसरली होती. साठे सरांच्या मते खरा बुद्धाचा धम्म तर याच पाच प्रतिज्ञेमधे आहे. आणि स्वतः धम्मपुत्र मानणारी किती  जनता या प्रतिज्ञेचे.अनुसरण करायला तयार आहे. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म व ह्या प्रतिज्ञा  दिल्या त्याच बाबासाहेबांच्या जयंतीत आपण DJ च्या तालावर दारू पिऊन नाचतो.यापेक्षा लाजिरवाणी  गोष्ट आपल्यासाठी काय असणार ?
प्रज्ञा शील करुणा अंगिकारून त्रिफळाच्या गुलामीला नभात घालवून लावणारी विचार क्षमता आम्ही हरवीत चाललोय काय असा प्रश्न उपस्थित होतो.
साठे सरांच्या मतानुसार ही आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालोच नाही असेच भाकित होते.

अमोल खडसे सर आपल्या लेखात लिहतात,
आपण हिंदूच्या 33 कोटी देवांना मानण्याऐवजी फक्त 22 प्रतिज्ञेचे नियमानुसार पालन करून जगण्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करावा. जे आज हिंदू महार म्हणून जगत असतील त्याला समाजात राहण्याचा काहीच अधिकार नाही.कारण,हेच लोक येणाऱ्या पिढीला बुद्धिस्ट होऊ देणार नाहीत.
समाजावर अत्याचार करणाऱ्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना अनुसरून खडसे सर म्हणतात, आमच्यावर आजही अन्याय अत्याचार चालू आहे.कारण, आम्हांला बाबासाहेबांनी  बौद्ध धम्म दिला म्हणून आम्ही तलवारी बाजूला ठेवल्या आहेत.पण तुम्ही असे समजू नका की आम्ही तलवारी चालवण्याचे विसरलो आहोत. कारण आजही आम्ही 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जावून अभिमानाने तिथली माती कपाळी लावतो.
माझे वय चोवीस आहे तरीही अजून मी कुणाला मतदान केले नाही कारण, आमच्या मतांवर निवडून आमच्याच वस्त्यावर हल्ले करणारे मी बघितले. खडसे सर सर्व आंबेडकरी नेत्यांना एक होण्यासाठी  विनंती करतात व शासनकर्ता जमात होण्यासाठी व बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांना आव्हान करतात.

प्रशिक चंदाबाई गनवीर सर लिहतात,
आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो नाही. कारण, बाबासाहेबांना जेंव्हा समाजाची परिस्थिती बदलायची होती तेंव्हा त्यांनी हिंदू धर्म त्यागून  बौद्ध धम्म स्वीकारला.कारण, त्यांना बौद्ध धम्मात कुठल्याच अनिष्ट चालीरीती,कर्मकांड,उचनीच दिसली नाही.म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकार केला. पण आज आपण काय करतो, गणवीर सरांच्या मते आजही आपण कर्मकांडात अडकलो आहे.भीतीपोटी का होईना पण आपण दगडापुढ माथा टेकतोच.
आणि जे स्वतःला कट्टर बौद्ध समजतात ते तरी काय करतात कर्मकांडच फक्त त्यांची कर्मकांड करण्याची पद्धत ब्राह्मणापेक्षा वेगळी आहे. जसे ब्राह्मण संस्कृतमधे मंत्र बोलतो तसेच आपण पाली भाषेत बोलतो पण त्याचे आचरण करत नाही त्यामुळे ते व्यर्थच.
बाबासाहेबांनी सांगितले की, माझा जयजयकार करू नका तर माझी चळवळ पुढे न्या पण आपण त्यांचा  जयजयकार करण्यातच गुंतलो.आपल्याला बाबासाहेबांचा भक्त बनून नाही तर अनुयायी बनून कार्य करावे लागेल तरच आपण बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध बनू अन्यथा नाही.

चंद्रशेखर भारती लिहतात,
बाबासाहेबानी गावातले महारवाडे  बंद करण्याची अपेक्षा होती पण दुःखाची बाब ही की, साठ वर्षानंतर ही महारवाडे आणि त्यांच्या वस्त्यावर फूस्स  फूस्सणारा जातिवादी नाग अजून जिवंत आहे. राज्यघटनेने जरी आपल्याला समतेचे तत्व बहाल केले तरी ते अजून पुस्तकातच बंदिस्त आहे.ते प्रत्यक्षात मात्र उतरलेलच नाही.
आज सुधारलेला समाज मागास असलेल्या बांधवाकडे ढुंकूनही बघत नाही त्यामुळे सर्वात जास्त समाजाच्या प्रगतीला बांधा येते.
आमचे राजकीय ही अंध:पतन झाले rpi चे अनेक तुकडे होऊन वेगवेगळ्या पक्षांशी स्वतःच्या फायद्यासाठी हातमिळवणी केल्यामुळे आम्ही आमच्यावर अन्याय झाला तर सरकारवर दबाव ही आणू शकत नाही.
धार्मिक बाबतीत ही तसेच धम्माचा प्रचार करणाऱ्या अनेक संस्था आहेत पण त्यांचे आपसातच मतभेद आहेत.
दर रविवारी विहारात जाण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही.आम्ही आमच्या समाजाचे वृतपत्र वाचण्याऐवजी प्रतिष्ठित वृत्तपत्र वाचण्यात धन्यता मानतो.
बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ दिला तो आम्ही वाचण्याऐवजी घरात एकाद्या कपाटात धूळ खात पडलेला दिसतो.
22 प्रतिज्ञेच्या चिंध्या करून आम्ही स्वतःच बाबासाहेब झालो.
आपण आज सामाजिक व धार्मीक बाबतीत दुभंगलो आहोत याचे कारण आमच्या पुढाऱ्याने बाबासाहेबांच्या शिकवणुकीचा सोयीनुसार लावलेला अर्थ होय.
आम्ही शिकलो  संघटित झालो पण गट गटाने.
आम्ही बाबासाहेबांच्या परीक्षेत नापासच झालो आहोत.

विजय तारा नामदेव सर लिहतात,
आपण बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे बौद्ध झालेलो नाही.
आपण एकमेकाच्या ऊनीवा काढण्यातच वेळ वाया घालवतो.पुस्तकी ज्ञान घेऊन वाटेल त्या विषयावर वाटेल ते बोलतो. हिंदू चालीरीतीना प्रथाना नावे ठेवणे सतत चालू असते.आपण आपल्या धम्माचा प्रचार करण्याऐवजी दुसऱ्या धर्माला  जास्त लक्ष का बनवतो ? दुसऱ्याचे वाईट बोलतांना आपण आपले चांगले कधी बोलतच नाही. जरी संगीतले तरी त्याचे प्रमाण अत्यल्प असते.आपण हे बदलायला हवे व धम्म प्रचारावर जास्त जोर द्यायला हवा.
इतरांच्या धर्मात काय वाईट काय चांगले याकडे लक्ष न देता आपण आपल्या धम्माचा अभ्यास करून तो समाजापर्यंत पोचवण्याचे काम करावे.आपण आपला पवित्र धम्म आचरणात आणूया व बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध बनूया.

रविंद्र कांबळे सर लिहतात,
आपण अजूनही बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध झालो नाही कारण सर्वात प्रथम समाजाला नावे ठेवण्याआधी आपण समाजाप्रती किती एकनिष्ठ आहोत याचे स्वतःच स्वतः चे अनुकरण केले पाहिजे.
कारण,नुसते फ़ेसबुक आणि व्हाट्सपवर रक्त उसळून चालणार नाही तर विहारी गेल्याशिवाय धम्माचा प्रचार होणार नाही.
गाव सोडून शहरात आलेला व्यक्ति स्वतः बौद्ध म्हणून घेत नाही इतकेच काय तर त्याला जय भीम म्हणायची सुद्धा लाज वाटते.विहारात कधी ढुंकूनही बघत नाही अशा परिस्थितीत त्याला व त्याच्या कुटुंबाला धम्म कळेल कसा ?
जर आपण विहारात गेलो नाही तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले बौद्ध कधीच बनू शकणार नाही.

(टिप : स्पर्धेसाठी लिहलेले लेख खूप मोठे आहेत मी फक्त काही महत्वाचे  मुद्देच इथे लिहले आहेत )

स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांची नावे खालील प्रमाणे

*प्रथम विजेता*

चंद्रशेखर भारती

*द्वितीय विजेता*

1) विजय तारा नामदेव

2) रविंद्र कांबळे

*तृतीय विजेता*

सुकेशनी विमल दिगंबर कदम

सर्व विजेत्यांचे अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

लवकरच सन्मानपत्र आपण दिलेल्या पत्त्यावर पोस्ट करण्यात येतील.

*भीम लेखणी विचारपीठ*

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...