रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिगामी वाटचाल

*पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिगामी वाटचाल*

महाराष्ट्रात कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठल्या समाजाचे मोर्चे निघाले नसतील, ते आज सर्वच समाज आपआपल्या समाजाची ताकत दाखवण्यासाठी मोर्चे काढत आहे.
कोपर्डीच्या हत्येच्या निषेधार्थ काढलेल्या मराठा मूक मोर्च्याचा  मूळ मुद्दा राहिला बाजूलाच,आणि बौद्ध व दलितांच्या संवरक्षणासाठी असलेला  *ॲट्रॉसिटी कायदा बंद करा* हिच मागणी मुख्य होऊन बसली त्यामुळे कळत न कळत बौद्ध व दलित समाजाचे या मोर्च्यांमुळे मने दुखावल्या गेली. त्यांच्यात अशांततेची भावना निर्माण झाली. एकमेका विरोधात द्वेष निर्माण होत गेला. आणि त्याचा पडसाद आपण नाशिक येथे पाहिलाही.
या अशांततेच्या भावनेतून दलित आणि बौद्ध समाजाने  ॲट्रॉसिटीच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात प्रतीमोर्चे काढायला सुरवात केली आणि त्यांना उद्देशून  *तुम भी देखो आँखों से, हम भी आये लाखो से*  असे सांगीत आम्हीही काही कमी नाही हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. नुकताच मनुवादाची  कीड़ झुंगारुन आंबेडकरी विचारांना आत्मसात करणारा मराठा बांधव पुन्हा आंबेडकरी विचारधारे पासून व बौद्ध बांधवा पासून  दूर लोटल्या गेला. आंबेडकर साऱ्या जाती धर्माचा म्हणणारा पुरोगामी मराठा वर्गही आज आंबेडकर फक्त बौद्ध आणि दलितांचेच आहेत त्यांनी आमच्यासाठी काय केले ?असे  म्हणू लागला. ज्या मराठा संघटनानी मोठ्या मेहनतीने मराठा समाजात फुले शाहू आंबेडकरी विचार रुजवले आज ते लयाला जातात की काय याची भीती निर्माण झाली.
औरंगाबाद विद्यापीठ नामांतरा  वेळेस बौद्ध,  मराठा वाद पेटला होता तसाच पुन्हा पेटणार की काय अशी भीती निर्माण झाली.
दलित, बौद्ध समाजावर होत असलेले अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही तोच मराठा समाज,  बौद्ध व दलितांचा  अत्याचार प्रतिबंधक कायदाच  रद्द करा अशी मागणी प्रचंड जनसमुदाय असणाऱ्या मूक मोर्चात होत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात बौद्ध,दलित वस्त्यात  भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. पण धम्मचक्र परिवर्तन दिनी मुख्यमंत्री साहेबांनी दीक्षाभूमीवरून जेंव्हा सांगितले की, दलित बांधवांना घाबरण्याचे कारण नाही. हा कायदा रद्द होणार नाही. तेंव्हा कुठे दलित व बौद्ध  समाजाच्या जीवात जीव आला. कारण, जातिवादी गावगुंड प्रत्येक गावात आहेत. हा कायदा असतांना जर एवढा  अत्याचार तर कायदा बंद झाल्यावर किती होईल ?

मूक मोर्च्याची दूसरी मागणी होती आरक्षण. आपण गावागावात  जावून सर्वे केला तर तुम्हांला समजेल की, काही बोटावर मोजण्या इतकी घरे सोडली तर मराठा समाजातल्या सर्वांनाच आरक्षणाची गरज आहे . म्हणून मराठा संघटनेचा  आरक्षण हा मुद्दा रास्त आहे हे  सर्वांनीच मान्य केले.पण कायद्याने मराठा समाजाला आरक्षण द्यायचे कसे ? ही मोठी समस्या महाराष्ट्र सरकार पुढे आहे. सद्ध्याची आरक्षणाची स्थिती  बघता मराठा  समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळणे शक्य नाही. त्यामुळे एकच पर्याय आहे, त्यांचा OBC मधे समावेश करणे. त्यानंतरच त्यांना न्यायिक मार्गाने आरक्षण मिळेल. पण OBC मधे समाविष्ट असलेल्या समाजाला भीती निर्माण झाली की महाराष्ट्रात प्रचंड मोठा असलेल्या मराठा समाजाचा जर OBC मधे समावेश झाला तर सद्ध्या आमच्या जातीला मिळत असलेले आरक्षण संकुचित होईल आणि या आरक्षणाचा फायदा फक्त मराठा समाजालाच मिळेल. त्यामुळे OBC बांधव प्रतीमोर्चे काढून सरकारला निवेदन देत आहे की, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही पण *आमच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना ते दिले पाहिजे.* OBC समाजाचे मोर्चे बघून पुन्हा मराठा विरुद्ध OBC हा नवा वाद पेटणार की काय ?अशी भीती वाटू लागली आहे. आपआपल्या हक्कासाठी विविध समाज रस्त्यावर उतरला असतांना मुस्लिम बांधव मागे कसे राहणार. मुसलमानही आता आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढून रस्त्यावर उतरला  आहे.

सद्ध्या महाराष्ट्रात निघत असणाऱ्या मोर्च्यांने काही निष्पन्न होणार की नाही हे  माहीत नाही पण एकमेका विरोधात द्वेष मात्र नक्की निर्माण होईल. त्यामुळे मला असे वाटत आहे की, पुरोगामी झालेला महाराष्ट्र पुन्हा प्रतिगामी वाटचाल करते की काय ?

मनोगत ..............🖋
( हा लेख कुण्या मोर्चेकरांच्या भावना दुखवण्यासाठी लिहला नसून हे माझे व्यक्तीगत मत आहे )

संजय बनसोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...