मंगळवार, २४ ऑक्टोबर, २०१७

बा भीमा.......

तूच दिला थारा
तूच दिला चारा
सोसाट्याचा मारा
परि तुझाच सहारा ॥

जातिवाद दाट
होता लई बाट
अंधाराची वाट
परि मुखी तुझा नारा ॥

तुझच हे देणं
तुझच हे लेेणं
तुझं गुणगानं
गातो जग आज सारा ॥

लेखणीला वाच्या
आली संजयाच्या
जयभीम नामाच्या
संग वाहे,समतेचा वारा ॥

संजय लिंबाजी बनसोडे

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

जेंव्हा जीवन मागत होतो

जेंव्हा मरण मागत होतो
तेंव्हा जीवनाशी भेटवले
जेंव्हा जीवन मागत होतो
तेंव्हा सरनावर पेटवले ॥

व्वा निसर्गा, तुझा खेळ
मी समजलोच नाही
हजार दिल्या ठोकर तु
तरीही बदललोच नाही ॥

पळत होतो पैशा मागे
शरीर ठेऊन गहाण
कमावले लाखो तरी,
भागली नाही तहान ॥

होते ते सखे तरीही
मनात त्यांच्या गुप्त होते
माझ्या पैशावर डोळा
हावपीसाट आप्त होते ॥

आप्तांच्या रूपात मला
हैवान तु भेटवले
जेंव्हा जीवन मागत होतो
तेंव्हा सरनावर पेटवले ॥

संजय बनसोडे

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

वीर संभाजी

मर्दानी त्याची ख्याती जणू पहाड़
सह्याद्रीही थरथरे ती ऐकून दहाड़ ।

स्वराज्यासाठी लावली प्राणाची बाजी
वीर संभाजी,संभाजी,संभाजी संभाजी ॥

अकाशाची उंची वाऱ्या सम मापे
थरथर थरथर औरंगजेबही कापे ।

कापले शत्रु मैदानी ना केली हाजी हाजी
वीर संभाजी,संभाजी,संभाजी संभाजी ॥

भगवं वादळं पेटलं, हिरव्या रानी
शिवबांचा छावा,ऐकू आलं कानी ।

ना झुकला शत्रु पुढे मरण्या झाला राजी
वीर संभाजी,संभाजी,संभाजी संभाजी ॥

संजय लिंबाजी बनसोडे

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

नाही तुझा ठाव रं

लंगड़ा तुझा डाव लेका
लंगड़ा तुझा भाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

दान आलं खूप तुला
सोन्याचं मुख रं
देणारा खाई तूप परि
नाही त्याला सुख रं ।

श्रद्धेचा घाली घाव
त्याला पैशाची हाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

नावानं तुझ्या आज
यानं मांडला गोंधळ
पुण्य नाही पाप केलं
यानं होऊन आंधळ ।

झाला वेडा गाव मनी
नाही भक्तीभाव रं
जगी किर्ती नाव परि
नाही तुझा ठाव रं ॥

संजय लिंबाजी बनसोडे

जातीची रगातपीती

बुडला याचा धर्म,
याची जात गेली सती
तरी राह्यली याच्या
डोसक्यामधी भीती ।

नवस,व्रत ,पूजा,भक्ती
हीच याची नीती
खितपत पडला ह्यो,
याला मिळणा गती ॥

झाली याला कशी,
जातीची रगातपीती
माणसाला झालीया,
माणसाचीच भीती ।

खपली माणुसकी,
जनावर झाली अती
खितपत पडला ह्यो,
याला मिळणा गती ॥

संजय बनसोडे

विटाळ

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

सर्जिकल स्ट्राइक

भारतीय जवाना प्रमाणे
भारतीय नागरिकांनीही
आता,सर्जिकल स्ट्राइक
करायला पाहीजे........
आणि
इथल्या सत्ताधाऱ्यांना
नेस्तनाबूत करायला पाहीजे.
स्वाईन फ़्लू प्रमाणे
महागाईचा संसर्ग देशाला
आपल्या कचाट्यात
घेत असतांना,
दुसरीकडे गोरक्षकांनी
आणि धर्म रक्षकांनी
दलित,मुस्लिम,पुरोगाम्यांना
संपविण्याचा विडा उचललाय
सत्ताधारी मात्र गप्पच......
शेतकऱ्यांच्या पिकांना
हमीभाव व कर्जमाफ़ी
गुलदस्त्यात ठेऊन
हाई कमांड प्रमाणे
होम कमांडही देशवारी
करतंय......
यांचा विरोध केला
तर आम्ही "साले" झालो
यांच्या विरोधात
आंदोलन केले तर आम्ही
"नकली शेतकरी"झालो
कर्जमाफ़ीसाठी सातत्याने
चकरा मारून ऑनलाईन
अर्ज भरले तर
आमच्या अर्जाची "बोगस अर्ज"
म्हणून मजाक उडवली...
आता बस्स.....
"बाबा, तुझे भीक नको
पण तुझा कुत्रा आवर रे......"
नको आता तुझ्याकडून काही.
कारण,
आता आम्हीही तुमच्या विरोधात
सर्जिकल स्ट्राइक करण्याची
तयारी करीत आहोत......

संजय एल बनसोडे

सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

सत्य

सत्य अजून मी जाणले कुठे
देवाला अजून मी मानले कुठे ॥

उपास,व्रत हे वायफळ आहे
खरे समोर मी आणले कुठे  ॥

मठ्ठाधीस, अब्जाधीश झाले
गरीबांना, भक्त गणले कुठे ॥

नवसासाठी जीवहत्या केली
माणूस तुम्ही,  बनले कुठे ॥

नसला जरी ,आहे म्हणती
भक्तीचे नाते ताणले कुठे ॥

संजय एल बनसोडे

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

दिलखुलास

दिलखुलास एकदा जगून बघ
स्वप्न सोडून एकदा रंगून बघ ॥

जन्म आहे तुझा एकदाच मित्रा
स्वतःभोवती एकदा दंगून बघ ॥

पळपळ पळाला आप्तासाठी तु
स्वतःसाठी , एकदा थांबून बघ ॥

सुंदर आहे विश्व सुंदर आहेत लोक
द्वेष, मत्सर एकदा त्यागून बघ ॥

धन मागाशील किती देवासमोर तु
प्रेम , माया एकदा मागून बघ ॥

दिलखुलास एकदा जगून बघ
स्वप्न सोडून एकदा रंगून बघ ॥

संजय एल बनसोडे

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

विकास वेडा झाला

मालाला हमीभाव नाही
कर्जमाफीचं ठाव नाही
आश्वासनांचा पेड़ा झाला
मंत्री, खाऊन रेडा झाला
म्हणूनच म्हणतो,
यांचा विकास वेडा झाला ॥

फार्म भरता भरता
वर्ष सरुन गेलं
कर्जमाफीचं स्वप्न,
उराशी मरून गेलं
शेतकऱ्यां भोवती आता
उपासमारीचा वेढा झाला
म्हणूनच म्हणतो,
यांचा विकास वेडा झाला ॥

पेट्रोलचे भाव गगनाला
भीडले
आमचे पीक मात्र भावाविना
किडले
"अभ्यास सुरू आहे.....!"
हा रोजचा धडा झाला
म्हणूनच म्हणतो,
यांचा विकास वेडा झाला ॥

संजय एल बनसोडे

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

चिमटा

निसर्गा

वाळलं, सारं जळालं,
रौद्ररूप तुझं कळालं
मी तुझाच चाकर
खातो तुझीच भाकर
तरी का ठेवितो अंतर...
का मुकं केलं अंबर 2 ॥
रानी पेटला वणवा
सारी धुराची हवा
इथं उड़ना पाखरू
झाला दिशहीन थवा
मार इन्द्ररूपी मंतर ॥
कणसात नाही दाणा
खिशात नाही आणा
कुपोषित झालं रानं
काय त्याचा रं गुन्हा
शस्त्रांवीना चाले संगरं ॥
उनाड रानी ये एकदा
बोलवू तुला रे कैकदा
गरज असा,बरस असा
मज तृप्त होऊदे सदा
शोध सुकाळी तंतर ॥
संजय एल बनसोडे


संजय बनसोडे 

आरक्षण आरक्षण

आरक्षण आरक्षण
ह्याला पण पाहीजे
त्याला पण पाहीजे
कायद्यात नाही तर
करु नवीन कायदे ।
नौकरी, धंदा,काम
हवं स्वस्त शिक्षण
आरक्षण आरक्षण ॥
कोपर्डी बलाढ्य अन्
खैरलांजी कमकुवत
जातीसाठी न्याय हवा
हीच साऱ्याची नियत ।
बिनशर्त हवे जातीसाठी
नका करू निरीक्षण
आरक्षण आरक्षण ॥
गोर् गरीब तिथेच आहेत
अच्छेदिन मिथ्यच आहे
कुणीही आले सत्तेवर तरी
सारे इथे लूच्चेच आहेत ।
दलित हत्या ढोरावानी
महत्वाचे आता गोरक्षण
आरक्षण आरक्षण ॥
जितका मोठा मोर्चा
तितकी मोठी चर्चा
सत्तेवर बसलेल्यांच्या
हलवतील खुर्च्या ।
न्याय दिला तर ठीक
नाहीतर तुरंत ॲक्शन
आरक्षण आरक्षण ॥

संजय बनसोडे 

पाणी दे पाणी

पीकं करपलं  माझं मन  हरपलं 
ढगातलं पाणी इथं नाही बरसलं 
भेगाळल्या रानात 
जाळणाऱ्या उन्हात 
सांगे मन माझं गऱ्हाणी.........
तहानलेल्या रानी,पाणी दे पाणी ॥

नाही ढोरा चारा,पिसाटला वारा
थांबलेल्या ढगा, दे थोडा थारा
कडाडू दे थोडा 
वाहू दे रं ओढा 
झुळझुळ मंजुळ  ऐकू दे कानी 
तहानलेल्या रानी,पाणी दे पाणी ॥

दिलासं तू घावं तुझं सांगू कुणा नाव 
पाण्यावीना कासावीसं,रान माळ गाव
येरे पुन्हा परतूनी 
तृप्त कर बरसूनी 
येऊ दे मुखी माझ्या सुखाची गाणी 
तहानलेल्या रानी, पाणी दे पाणी ॥

संजय बनसोडे

दुःख आलं डोईवरी

रातीला भित नाही गडद अंधारं 
इखाला पीत नाही माणूस झुंजारं  ।

हरपलं सुख, पोटं मागे भाकरी....
जगणं झालं भारी,कर्ज सावकारी 
फिटता फिटना दुःख आलं डोईवरी ॥

करपल्या रानाचा काय भरवसा ठेउ 
उदरात नाही माझ्या, तुला काय देऊ ।

रातदिस उपाशी मी करितो चाकरी
जगणं झालं भारी,कर्ज सावकारी 
फिटता फिटना दुःख आलं डोईवरी ॥

मन धावे सैरावैरा भेटना विसावा
दारिद्री कलंक कुणी त्याचा रं पुसावा । 

शिवना त्याला ते सुख अहंकारी
जगणं झालं भारी,कर्ज सावकारी 
फिटता फिटना दुःख आलं डोईवरी ॥


संजय एल बनसोडे

नास्तिक विचार

कुजक्या संस्कृतीशी पुन्हा भांडतो मी 
नास्तिकी विचारा नव्याने मांडतो मी ॥

सोडून जात धर्म माणूस आज झालो 
अंधश्रद्धा तुझी ती नव्याने कांडतो मी ॥

भरला मी नव्याने डोक्यात विवेक माझ्या
तुझा देव अन् धर्म नव्याने सांडतो मी ॥

दगडाच्या देवाला पूजने केले मी बंद 
माणसातच आता खरा देव ढूंडतो मी ॥

काय सांगू संजया दशा माणवाची
खरे सांगून त्याशी खोटे उंडतो मी ॥

कुजक्या संस्कृतीशी पुन्हा भांडतो मी 
नास्तिकी विचारा नव्याने मांडतो मी ॥


संजय  बनसोडे

विझली मशाल पेटव

विझली मशाल पेटव रण  पुरोगामी  उठव
फुले  शाहू  आंबेडकर कार्य त्यांचे मनी आठव विझली मशाल पेटव !!

प्रेम ठेव मनी कर समतेची पेरणी एकीची कर करनी एकतावाद जगी उठव
विझली मशाल पेटव !!

शीलाचा तू शीलदार शिवबांचा करजदार भिवाचा वारसदार लेखणी पुन्हां उमटव विझली मशाल पेटव !!

बुद्ध कबीर आणी फुले त्यामुळे माणुसकी डोले संजय ही मनी बोले पुन्हां विचार त्यांचे आठव
विझली मशाल पेटव !! 

संजय बनसोडे

विषय गणपतीचा नाहीच....

पूर्वीपासुनच या देशात दोन विचारधारा चालत आल्या आहेत.एक आहे देवाचे अस्तित्व मानणारी आणि दूसरी आहे देवाच्या अस्तित्व न मानणारी. साहजिकच देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांचा पाया हजारो वर्षापासून भक्कम आहे...तर देवाचे अस्तित्व न मानणारी नास्तिक विचारधारा आजपर्यंत या सनातनी पूराच्या प्रवाहात शाबूत ठेवण्याचे काम त्या त्या काळातल्या महापुरुषाने केले आहे.चार्वाक, बुद्ध , व्हाया फुले आंबेडकरांमार्फत ही विचारधारा इथपर्यंत आली आहे..देव आला की कर्मकांड आले. अंधश्रद्धा आली..धर्म,जात,पंत आला आणि त्या सोबत धर्म कट्टरता आली.दुसऱ्या धर्माच्या देवांविरुद्ध द्वेष आला.
पूर्वी कधी नाही तितकी वैचारिक सुधारणा आपल्या महाराष्ट्रात या नऊ दहा वर्षात झाली आहे.आणि ही सुधारणा फक्त एकाच धर्मात किंवा एकाच जातीपुरती मर्यादित नव्हती..आज मुस्लिम समाजही आपल्या धर्मातील अनिष्ट रुढी विषयी आवाज उठवताना दिसत आहे..हिंदू, बौद्ध धर्मातही हे बदलाचे वारे तीव्र गतीने वाहताना दिसत आहे..हिंदू धर्मातून विवेकी पद्धतीने अंधश्रद्धा दूर करून समाजाला डोळस करण्याचे काम "अंधश्रद्धा निर्मुलन समिती" सारख्या संघटनेने केले आहे. तर हजारोवर्षापासून गरीब, शेतकऱ्यांना लुटून एका विशिष्ट समाजाचे वर्चस्व असणाऱ्या ब्राह्मणी पूजापाठ पासून समाजाला डोळस करण्याचे काम "संभाजी ब्रिगेट" सारख्या संघटनेनी केले आहे..
आज हिंदू समाजातही ज्यांनी रुढी परंपरा नाकारुन पुरोगामीत्व स्वीकारले असे आपल्या घरात गणपती बसवत नाहीत गुढी पाडवा साजरा करत नाहीत. पण बौद्ध समाजात एक दोघांनी गणपती बसवला व बौद्ध तरुणांनी त्यांना तिथे जावून खडसावले आणि महाराष्ट्रभर उलट सुलट चर्चेचा ऊत आला....
जगताप कुटुंबीय म्हणाले की आम्ही नवस बोललो होतो व तो पूर्ण झाला म्हणून आम्ही गणपती बसवला. जगताप कुटुंबीयांच्या डोक्यात जी ढासुन अंधश्रद्धा भरली ती याला कारणीभूत आहे.त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून ते कृत्य त्यांनी केले. त्याला खऱ्या प्रबोधनाची गरज आहे. नवस वैगेरे हे फक्त थोतांड आहे. बाबासाहेब आणि बुद्धाच्या विचाराचे दाखले देऊन समाज बांधवानी त्याचे प्रबोधन करायला हवे पण तसे न करता त्याच्या घरचा वीडियो सोशियल मीडियावर वायरल करून जगताप कुटुंबीयाची बदनामी करण्याचे काम केले व काही न्यूज़ पेपरने त्याला गद्दार घोषित करून त्याच्या मोबाईल नंबर सहित त्यांच्या कारनाम्याची बातमी फ्रंट पेजला छापली.
एका बाजूला हे सर्व होत असताना दुसऱ्या बाजूला हिंदू समाजाचा प्रिय असलेला गणपती बसवला म्हणून बौद्ध समाज आपल्याच समाज बांधवाना गद्दार घोषित करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करीत आहे त्यामुळे विरोधकाच्या हाती आयतेच कोलीत आले व, मानवतावाद व समता सांगणाऱ्या बौद्ध धम्मात बौद्ध तालिबानी बनत आहेत. असा त्यांनी समाचार घेतला...आज सोशियल मीडियावर एक अशी फळी निर्माण झाली आहे त्यात फक्त बौद्धच नाही तर हिंदू समाज बांधवही भरपूर आहेत ज्यांनी पुरोगामी विचारधारेचा स्वीकार केला ते आज हिंदू धर्माच्या अनिष्ट रुढी परंपरेवर टीका करतात.गणपती का बसवू नये हे पूर्वीच्या विचारवंताचे दाखले देऊन सांगतात....बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या विचारांना फाटा देत जगताप कुटुंबीयांनी मुद्दामहून गणपती बसवला नाही तर त्यांचे प्रबोधन न झाल्याने अंधश्रद्धा कारणीभूत ठरली. समाजप्रबोधन हे चार भिंतीच्या आत व्हायला पाहीजे.जे बाबासाहेब जातीअंतासाठी लढले, त्यांचेच नाव घेऊन जर आपण जातिवाद पसरवत असाल तर नक्कीच इतर धर्मीयांचा बाबासाहेब आणि बौद्ध धम्माकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वतच्या देवांवर व संस्कृती वर जर इतर धर्मीय टीका, टिप्पणी करीत असेल तर भावना दुखावल्या जाणारच. जेंव्हा आपण ह्या सर्वे पोस्ट (भाऊ कदम,जगताप कुटुंबीय,हिंगोलीचे शिक्षक) सोशियल मीडियावर वायरल करीत होतो तेंव्हा हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या हे साहजिकच आहे...समोरच्याला विचारांनी पराजित करावे हीच आंबेडकरी शिकवण आहे आणि ती आपण जोपासलीच पाहीजे.
आंबेडकरी विचारधारा आत्मसात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस इतर धर्मात झपाट्याने वाढत आहे आणि अश्यात आपण बाबासाहेब आंबेडकर यांना एकाच जातीत बांधण्याचा प्रयत्न कराल तर भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न फोल ठरेल..आंबेडकरी विचारधारा आज सर्वच समाज स्वीकारतांना दिसत आहे. कुणाच्या भावना दुखवून समाजप्रबोधन होत नाही. समाजप्रबोधन हे इंजेक्शना प्रमाणे झाले पाहीजे. समोरच्याला वेदनाही जाणवल्या नाही पाहीजे आणि त्याचा रोगही बरा झाला पाहीजे.....
मनोगत................
संजय एल बनसोडे
9819444028

तुह्या देशात माणुसकी नाय रं

सत्यावरी करी असत्य घाव रं 
विषमतेचं मुखी नित्य नाव रं 
खेळ ईखारी मौत तुझा डाव रं ॥

रडे धाय धाय   माझी माय रं 
तुह्या देशात माणुसकी नाय रं ॥

बिथरलं सारं , लेखणी आधार
कैद केलं तिला खुपसुन हत्यार 
तरी ना घेतली आम्ही माघार ॥

वैरी माणसं, आप्त तुझी गाय रं 
तूह्या देशात माणुसकी नाय रं ॥

थांबविन आम्ही तुझ्या रं गोळीला
संपविन आता तुझ्या त्या टोळीला
नको विसरू,संजयाच्या ओळीला ॥

उद्याचा दिस आमचाच हाय रं 
तुह्या देशात माणुसकी नाय रं ॥

संजय एल बनसोडे

गुरुवार, २५ मे, २०१७

प्रेमासाठी आगार व्हावे.....

कुपोषितांचा आहार व्हावे
कष्टकऱ्यांची पहार व्हावे
विसरून दुखाला आपल्या
दुसऱ्यासाठी बहार व्हावे !!
सोड वल्गना जखमेच्या
गरीबांसाठी विहार व्हावे !!
ओटी तुझी विरहाची जरी
आप्तासाठी अपार व्हावे !!
माणूस जरी तु जख्मेचा
परदुखाला आचार व्हावे !!
माणूस जोडण्या संघर्ष हा
प्रेमासाठी आगार व्हावे !!
प्रेमासाठी आगार व्हावे.....
संजय एल बनसोडे

अतुल तापकीर आत्महत्या

#सम्यक_वर्तमानकाळ
संजय एल बनसोडे.......🖊
अतुल तापकीर यांच्या आत्महत्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, समाजात फक्त महिलाच पुरूषाच्या अत्याचाराला बळी पडत नाही तर प्रियंका सारख्या अनेक महिला आहेत ज्या अतुल सारख्या अनेक पुरुषांना आत्महत्या करण्यास मजबूर करतात......
आज अतुल आमच्यातून गेला पण आपल्याला या सोशल मीडियाच्या जगात अनेक प्रश्न उपस्थित करून गेला.
सद्ध्याच्या तरुणांचे जीवनच सोशल मीडियावर ऑनलाइन झाले आहे. प्रत्यक्षात मित्रांना न बोलणारे मोबाईलवर ऑनलाइन तासंतास बोलतात.स्वतःच्या भावना सतत सोशल मीडियावर मांडणारे आजचे तरुण दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या आहारी जात आहेत की काय अशी भीती निर्माण होत आहे.लग्न झाल्यानंतरही कित्येक जुने मित्र प्रत्यक्षात नाही पण ऑनलाइन सोबत असल्यामुळे कित्येकांचे घटस्फोट झाल्याचे उदाहरणे आहेत.
कित्येक पालक ऑफीसवरून घरी परतल्यावर कुटुंबाला वेळ देण्यापेक्षा मोबाईलवर ऑनलाइनच मग्न असतात.सकाळच्या नाश्ताच्या प्लेट पासून ते रात्रीच्या जेवणाच्या प्लेट पर्यंत फ़ेसबुकवर शेअर करणाऱ्यांची संख्या असंख्य आहे.लिंकवर सतत येणाऱ्या लेखमुळे पुष्कळजन न वाचतात लाईक अथवा कमेंट करून मोकळे होतात.
नेमकी समोरच्याची भावना काय त्यांचे म्हणणे काय हे न बघताच ठेंगा दाखवणारे बहाद्दर खूप आहेत फेसबुकवर. मी काय लिहले हे न वाचताच लाईक करणाऱ्या मित्रावर शेवटच्या क्षणी अतुलने दुःख व्यक्त करीत " मी काय लिहले ते न वाचताच लाईक करताय. कसे मित्र आहात तुम्ही ?"
खरे तर त्या घडीला अतुलला खऱ्या मित्राची गरज होती.पण ती घटना कोणत्याही मित्रांनी गांभीर्याने घेतली नाही. अतुलची पोस्ट वाचून मित्रांनी त्याची तेंव्हा समजूत काढली असती तर कदाचित त्याने त्याचा निर्णय बदलला ही असता.

तुझ्या झेंड्याला दांडा कुणाचा

चळवळीच्या गाडीला
बैल बांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
झुडपामधी लपुन तुला
खूणवतय कोण ?
बसून खुर्चीवर तुला
बनवतय कोण ?
भोवती तुझ्या जमला
त्यों तांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
झेंडा दिसते फीका
झालं कापड जुनं
बंद कर लेका तुझं
ते विषमतेच गाणं !
उभ्या कणसाला त्या
 सांग धांडा कुणाचा ?
पोरा तुझ्या झेंड्याला
सांग दांडा कुणाचा ?
संजय एल बनसोडे
9819444028

हुंडा........

हुंडा........
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हुंडा
जावायाच्या हट्टापाई 
हप्त्यावर काढली होंडा ...!
एक एक पाई कमवीत होतो
दाग दागिने जमवीत होतो
सणवार सारे त्यागित होतो
कारण ....,
एका पोरीचा मी बाप होतो
काळजावानी जपली आजवर
वयात आली यंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
पोरगी आली ज्वानी म्होरं
मनास पडला माझ्या घोरं
टपुन बसले सारे टवाळखोरं
मनास त्यांच्या दडलाय चोरं
लपवू तरी त्यांच्यापासून,
पोर माझी कितींदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
पसंद पडला डॉक्टर नवरा
पैशाच्या होता थोडा हावरा
दहा लाख हूंडा द्या मजला
हसत मुखानी मज वदला
मान पाणी, दाग दागिने
खर्च तुमच्याकडे समंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
गरीबीत मी आलो जरी
पोर मात्र दिली चांगल्या घरी
या हूंड्यापाई आयुष्यभर,
कर्ज फेडतो सावकारी
सुशिक्षित लोकांचा या
कसला हा धंदा !
विकून वावर गुंठा गुंठा
दिला पोरीला हूंडा ...!
संजय एल बनसोडे
9819444028

चळवळीचं गाणं


तुझीच नाती तुझीच माती
परि परका तुझ्या तु गावा 
जाग आगरी भावा आता
तु जाग आगरी भावा ll
जमीन गेली शिवार गेलं
तुझचं समदं गेलं
सुधारणाच्या नावाखाली
तुलाच परकं केलं
भेटले का तुला ते सगळे
सरकारनं केला जो दावा
जाग आगरी भावा
आता...............ll
सगळ्यांना तु आपलं केलं
तु मोठ्या मनाचा
तुझ्याच घरा म्होरं उभा तो
बंगला हाय कुणाचा
दर्याचा तु राजा लेका
महाराष्ट्राचा तु छावा
जाग आगरी भावा
आता ...............ll
संजय एल बनसोडे
9819444028

शनिवार, ६ मे, २०१७

पेटली मशाल

पेटली मशाल, पेटली विशाल
पेटली निशा सारी पेटली दिशा
भडकला तो ज्वाला sssssss
जाळण्या अंधाराला !!
मैत्री कालची वैरी झाली
जखम नव्याने गहरी झाली
खेळ मांडला पुन्हा सूडाचा
दुभांगला मावळा गडाचा
वाचा फुटली नव्याने
जुल्म अत्याचाराला !!
रंग प्रीय ते झेंड्याचे झाले
कळप पुन्हा मेंढ्याचे झाले
द्वेष एकमेका अनावर झाला
माणूस पुन्हा जनावर झाला
अंधार समजुनी मारती
जो तो खऱ्या सूर्याला !!
मशाल कालची कधीच विझली
वस्त्या पेटविण्या आज वैरी उठली
बदलाची आशा सोडून द्या रे
दंगलीत तल्लीन झाली सारे
एक होवूनी सावध व्हारे
उधाण आले दर्याला !!
संजय एल बनसोडे

न पटणारे सत्य.....


न पटणारे सत्य.....
त्याला देवाच्या गोष्टी
सांगू नका साहेब
तो एक नास्तिक आहे 
आताच तो बुद्धाच्या
मूर्तीसमोर नतमस्तक
होऊन आलाय.........
त्याला देवाची व्याख्या
सांगू नका साहेब
तो विज्ञानवादी आहे
त्यांनी मूर्ती भंजक
बाबासाहेबांनाही
परमपूज्य उपमा दिली....
त्याला जातिवाद
शिकवू नका साहेब
तो जातीअंताची
लढाई लढत आहे
आपल्या जातीचा
उदोउदो करून
दुसऱ्या जातीवर शिंतोडे
उडविण्यातच त्यांनी
सारे जीवन व्यथित केले....
त्याला महापुरुषाच्या
गोष्टी सांगू नका साहेब
त्यानी त्याचा महापुरुष
जातीच्या दावणीला
बांधलाय
अन् खुशाल टीका करतोय
दुसऱ्या जातींच्या
महापुरुषावर.....
त्याला धर्माच्या गोष्टी
शिकवू नका साहेब
त्यांनी कधीच
जाती धर्माला
तिलांजलि वाहिली
तो नुकताच
श्रामनेर मधून आलाय.....
संजय एल बनसोडे

प्रेम माझे नेक होते

प्रेम माझे तर नेक होते
पण तिचे फ्रेंड अनेक होते !
मरत होतो तिच्यावरच मी
पण तिचे हसणे फेक होते !
भाळलो होतो तिच्या रूपाला
 तिचे चाळे मात्र कैक होते !
ह्रुदयातून केले प्रेम मी तिला
तिचे प्रेम कॉकटेल शेक होते !
संजय एल बनसोडे

गा गाणं झुंजार



कोणताही पर्यायी मजकूर उपलब्‍ध नाही.
सूर्य गेला परतीला
राहिला अंधार
घे पेटती मशाल
गा गाणं झुंजार !!
अंधाराचे भय
ना लढणाऱ्या काजव्याला
वादळाची भीती
ना उडणाऱ्या थव्याला
वाघ होऊनी दे
दुश्मना ललकार !!
विद्रोही शस्त्र
हाती घेऊनी चालतो
मुक्या पामराला
शब्द देऊनी चाललो
 खवळला मारण्या
तो वैरी सागर !!
जरी पोटात पेटली
भाकरीची आगं
क्रांतीसाठी जगण्याचा
केलाय मी त्यागं
भीमक्रांतीची येई
ओठी हुंकार !!
घे पेटती मशाल
गा गाणं झुंजार !!
संजय एल बनसोडे

चालला पुढेपुढे हा भीम कारवा

जय भीम तयाच्या मुखी गोडवा
शील बुद्धाचे संगी अंगी थोरवा
चालला......
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
ना द्वेष कुणाचा ना मत्सरं
अंगी लावूनी शांतीचे अत्तरं
जाई जिथे तिथे दिसे त्याचा गवगवा
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
प्रज्ञा शील करुणा त्याचे शस्त्र
बा भीमाच्या विचारांचे केले अस्त्र
वादळे तूफ़ानही केली शांतीची हवा
चालला पुढेपुढे हा भीम कारवा !!
बाकी ओळी संग्रहीत
संजय एल बनसोडे 

किर्ती तुझी मोठी सुर्याहून

किर्ती तुझी मोठी सुर्याहून
मूर्तिमंत झालासी दर्याहून
तुटता नाळ झाला विटाळ
ना मोठा काळ कर्माहून 
कीर्ती तुझी मोठी सूर्याहून !
दिलासी बुद्ध करण्या शुद्ध
नको ते युद्ध धर्माहून
किर्ती तुझी मोठी सूर्याहून !
तूच गुणज्ञ तूच सर्वज्ञ
तूच जगी सुज्ञ ऋताहून
कीर्ती तुझी मोठी सूर्याहून
संजय एल बनसोडे 

भूक

रस्त्यावर चालणाऱ्या
एका जोडप्याने
मॅकडोनाल्डमधला
अर्धा प्यालेला कोक
रस्त्यावर फेकला.
जमिनीवर बसलेल्या
पक्षावर घारने
झडप घालावी
तशी त्याने त्या
उष्ट्या कोकवर
झडप घालून तो कोक
हातात घेऊन
प्यायला लागला...
बिना बटनची
गळत असलेली पँट
वर करीत
तो पुन्हा आपल्या
कामाला लागला.
बसच्या प्रतिक्षेत
असलेल्या प्रवाशांचे
शर्ट ओढत तो
मागत होता भीक.
उभे असलेले
त्याला भीक देणे दुरच
त्याचा आक्राळविक्राळ
चेहरा बघून,
त्याच्या स्पर्शाने
कपड़े घाण होतील म्हणून
त्याच्या
लांबच रहात होते....
तो मात्र एका हातात कोक
घेऊन
सर्वांकडे जात होता.
त्याचे घाणेरडे रूप बघून
एकाने त्याला लाथ मारली
व म्हणाला,
"भाग यहाँ से "
आपले गळणारे नाक
मनगटाने पुसत
तो त्याला म्हणाला,
"मारो मत साब
दो दिन से भूका हूँ "
पुन्हा त्या व्यक्तीने
हात उगारलेला पाहून
तो तेथून पळून गेला
एका दुसऱ्या स्टॉपच्या
शोधात....
संजय एल बनसोडे

स्वातंत्र्य नावाची रांड

माणसांच्याच वस्तीत जेंव्हा
माणुसकी कोपली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
अत्याचार करून आमच्यावर
ते सारे होते मस्तीत
चळवळ आमची लपली होती
तेंव्हा छक्क्याच्या वस्तीत !
सूटा बुटावर आमच्या जेंव्हा
त्याने शिव्यागीळ झोकली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
आमच्या अब्रूचा धिंगाना
सरेआम चालू आहे
दलित नेते विकत घेण्याचा
हायस्ट दाम चालू आहे !
गद्दार होऊन समाजाला त्याने
जेंव्हा सत्ता चाखली होती
स्वातंत्र्य नावाची रांड तेंव्हा
सनातन्याखाली झोपली होती !!
संजय एल बनसोडे

माणसाच्या रूपात, हैवान फार झाले

माणसाच्या रूपात, हैवान फार झाले
भुकेला बाहेरी, मंदीरी दान फार झाले !
जरी शोषीत गुलामीत, जीवन कंठती
तरी शोषकांचे येथे, गुणगान फार झाले !
भाकर बेईमान झाली,आज गरीबीला
श्रीमंतीला न मागता, अन्नदान झाले !
माणूस असूनही वाटे, माणसांची भीती
बेईमान सारे आज,येथे दयावान झाले !
जो तो माखलाय , जातीच्या गटारात
एक दुसऱ्या मारण्या, सारे शैतान झाले !
संजय एल बनसोडे

कविता......

कविता......
पोटामधे भुक, आतडे फाडू पाहत होती
तरीही ओठात माझ्या कविताच वाहत होती !
धान्यांची कणगी माझी कित्येक दिस खाली होती
तेंव्हाही पोटाने माझ्या कविताच व्याली होती !
बेरोजगार होऊन फिरत होतो कामाच्या शोधात
तेंव्हा भुकेला कविता करून चघळत होतो ओठात !
आप्त मिळून सारे माझे,जेंव्हा कोसत होते मला
जगण्यासाठी कामी आली तेंव्हा कवितेची कला !
विझवत होते वैरी जेंव्हा शब्द माझे पेटलेले
कामी आले तेंव्हा तुम्ही, मित्र मला भेटलेले !
संजय एल बनसोडे

काजव्यांचा प्रकाश

ह्या इथल्या
प्रस्थापित सूर्याला
आम्हां काजव्यांचा
प्रकाश
अमान्य आहे....
त्यामुळे आम्हीं
अंधारच
प्रकाशमय करण्याचा
विडा उचललाय....
संजय एल बनसोडे
कालच रक्तदान करून आलो
पण त्या पिशवीवर
"दलित रक्त " लिहण्याचे
विसरूनच गेलो.
एखाद्या उच्च जातींच्या 
व्यक्तीला ते रक्त चढवले
तर त्याचे
सर्वच शरीर बाटेल
या हेतूने .....
दारासमोर फुटक्या मडक्यात
ठेवलेले पाणी
सारे पक्षी मिळून पीत होते.
त्यांनाही त्यांचा धर्म
विचारायला पाहिजे होता.
त्यांनाही आता सांगायला हवं
हे पाणी
एका शुद्राच्या घरचं आहे....
निसर्गाने तीला तिच्या
वासरासाठी दिलेलं दूध
काल भाकरी सोबत
वरपून वरपून खात होतो.
खाताना मी एक गोष्ट
विसरलोच,
ते एका गो मातेचे दूध होते.....
उद्यापासून
रस्त्यावर बसणाऱ्या भिकार्याला
त्याची जात विचारून
भीक देण्याचा
विचार करतोय......
माणसाला मूळव्याध
होऊन चिटकलेली जात,
महापुरुषाच्या दवाने
थोड्या वेळ शांत बसेल
पण काही दिवसांनी
उचमळणारच .......
संजय एल बनसोडे

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

जाळण्या अंधाराला

पेटली मशाल, पेटली विशाल
पेटली निशा सारी पेटली दिशा
भडकला तो ज्वाला sssssss
जाळण्या अंधाराला !!
मैत्री कालची वैरी झाली
जखम नव्याने गहरी झाली
खेळ मांडला पुन्हा सूडाचा
दुभांगला मावळा गडाचा
वाचा फुटली नव्याने
जुल्म अत्याचाराला !!
रंग प्रीय ते झेंड्याचे झाले
कळप पुन्हा मेंढ्याचे झाले
द्वेष एकमेका अनावर झाला
माणूस पुन्हा जनावर झाला
अंधार समजुनी मारती
जो तो खऱ्या सूर्याला !!
मशाल कालची कधीच विझली
वस्त्या पेटविण्या आज वैरी उठली
बदलाची आशा सोडून द्या रे
दंगलीत तल्लीन झाली सारे
एक होवूनी सावध व्हारे
उधाण आले दर्याला !!

न पटणारे सत्य.....

न पटणारे सत्य.....
त्याला देवाच्या गोष्टी
सांगू नका साहेब
तो एक नास्तिक आहे 
आताच तो बुद्धाच्या
मूर्तीसमोर नतमस्तक
होऊन आलाय.........
त्याला देवाची व्याख्या
सांगू नका साहेब
तो विज्ञानवादी आहे
त्यांनी मूर्ती भंजक
बाबासाहेबांनाही
परमपूज्य उपमा दिली....
त्याला जातिवाद
शिकवू नका साहेब
तो जातीअंताची
लढाई लढत आहे
आपल्या जातीचा
उदोउदो करून
दुसऱ्या जातीवर शिंतोडे
उडविण्यातच त्यांनी
सारे जीवन व्यथित केले....
त्याला महापुरुषाच्या
गोष्टी सांगू नका साहेब
त्यानी त्याचा महापुरुष
जातीच्या दावणीला
बांधलाय
अन् खुशाल टीका करतोय
दुसऱ्या जातींच्या
महापुरुषावर.....
त्याला धर्माच्या गोष्टी
शिकवू नका साहेब
त्यांनी कधीच
जाती धर्माला
तिलांजलि वाहिली
तो नुकताच
श्रामनेर मधून आलाय.....

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

तिचा स्पर्श

तिचा स्पर्श
पावसाच्या पहिल्या थेंबासारखा
मोहित करणारा...........
तिचा स्पर्श 
मोगऱ्याच्या फूलासारखा
सुगंधित करणारा............
तिचा स्पर्श
वसंतातल्या मोरा सारखा
ह्रुदयात नाचनारा.......
तिचा स्पर्श
मृगजळाच्या आभासा सारखा
तृष्णा लावणारा.........
तिचा स्पर्श
श्रावणातल्या वाऱ्यासारखा
बेधुंद करणारा..........
तिचा स्पर्श
गुरुत्वाकर्षणा सारखा
 आकर्षित करणारा.......
#TrueLove
संजय एल बनसोडे

मी

त्याने
माझे
अस्तित्व
संपवण्यासाठी
मला अग्नीत फेकले ....
अन्
मी
आग
झालो.....
आता जाळतोय
त्यांच्याच
वस्त्या .....
त्यांचे
अस्तित्व संपवण्यासाठी
संजय एल बनसोडे

प्रेम म्हणजे काय असते ?

प्रेम म्हणजे काय असते ?
दोन चामड्याचा खेळ
का आयुष्यभराचा मेळ !
प्रेम म्हणजे काय असते ?
दोन मनाची वासना
का आयुष्यभराच्या वेदना !
प्रेम म्हणजे काय असते ?
दोन मिनिटाचे सुख
का आयुष्यभराचे दुख !
प्रेम म्हणजे काय असते ?
दोन जिवाचा संसार
का आयुष्यभराचा अंधार !
प्रेम म्हणजे काय असते ?
इच्छा नसतांनाही आलेल्या कळा
का आयुष्यभरासाठी लागलेला लळा !
प्रेम म्हणजे काय असते ?
एका सोबतच उपभोगलेली मजा
का आयुष्यभर वाट्याला आलेली सजा !
प्रेम म्हणजे काय असते ?
जे पण असते
ते प्रत्येकाचे सेम नसते !

संजय एल बनसोडे

जातिवादी व्यवस्था

मी तिला यशवंत मनोहरची
कविता ऐकवली
तिने तोंड वाकडे केले...
मी तिला नामदेव ढसाळची 
कविता ऐकवली
ती माझ्यावर चिडली....
मी तिला भगवान निळेची
कविता ऐकवली
ती रागावून निघून गेली...
चंद्राच्या शीतल छायत
चांदण्यात,
रानात, नाजुक फूलात
रमणारी ती....
कदाचित
तिला आमची वास्तववादी कविता
आवडली नसावी ....

संजय एल बनसोडे

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

आई

असह्य वेदनेने, जरी डोळ्यात पूर होता
मायेने पाजणारा, तो तुझाच ऊर  होता



आईच्याही पलीकडे, होती वात्सल्याची काया
तुझ्या मायेने संचारीलेला,हा आल्हादी नूर होता



व्हावे अजून पुन्हा, तुझे नव्याने बाळं
तुझ्या प्रेमाचा पाळणा,त्या अंबरी दूर होता



केल्या कित्येक खोड्या,मारले कित्येकास मी
चुक पदराआड लपवीणारा,तो तुझाच सूर होता



होई आकांत मनी या, तुझी आठवण येता
रहिले अधूरे तुझे स्वप्न, मनी काहूर होता



Sanjay l. Bansode
9819444028

भारत आमचाही देश आहे...

अरे ...रटाळणाऱ्या मसणवट्यांनो 
आम्ही तुमच्या गावाबाहेर आहे
देशाबाहेर नाही.......
तुमची जातिवादी
कोल्हेकुई झाली असेल तर,
एकदा जाती अंतासाठीही
मोर्चे निघू द्या.......
आजही तुमच्या लग्नात
आमची पंगत शेवटीच बसते
तेही ताटा तांब्या सोबत ........
गावातल्या सावकऱ्यांनो
शेटजी भटजीनो,
आजही तुमच्या गावात
आमच्या वाटेला बाटच आलाय....
आजही सूर्के मारीत पीतो
आम्ही तुमच्या घरातला चाय
फुटक्या ग्लासातून.......
आजही तुमच्या विहीरीवरून
पाणी भरण्याची मुभा नाय
कित्येक देवस्थानाची
पायरी चढण्याची अनुमती  नाय........
या सळसळत्या रक्ताला
पेटण्या अगोदरच मी बुच मारला
तो एकाच नात्यामुळे.......
नाहीतर कधीच
गावकूसावरून तोफा डागल्या असत्या
तुमच्या उच्चभ्रू वस्त्यावर .....
गाव रंक्तरंजीत करायला
पण नाय ....
हा "भारत आमचाही देश आहे "
आणि तुमचाही .........
संजय एल बनसोडे 9819444028

पुन्हा सकाळ झाली

अंधार पेलणारे, किरणें खट्याळ झाली
उठा नव्या आशेने, पुन्हा सकाळ झाली !!


होतो जखडलेला,त्या प्रारब्ध काळोखात
त्या सत्ताधारी तिमिराचे, अदृश्य कंकाळ झाली !!


प्रसृत होते सारे, स्वप्न काजव्यांचे
प्रकटता मार्तंड, स्वप्ने आभाळ झाली !!


आम्हीं शांतीचे भुकेले, ना वैर कुणाशी
बघता अस्त्रे अमुची, आयुध घायाळ झाली !!


आरक्त मानवाचे, मंग जातिभेद कशाला
त्या थोतांड धर्मग्रंथाचे, शब्द रटाळ झाले !!



संजय एल बनसोडे 9819444028

जातीच्या नावावर

जातीच्या नावावर,
विषयहीन झालेले
ते आजही काढतात मोर्चे
शहरा शहरातून
दिशाहीन झालेले
शेतकरी
आजही घेतात फाशी
खेड्यापाड्यातून
.
जात नावाचं गजकर्ण
फोफावतय
माणसांच्या गचाड वस्तीत
तुमचं आमचं पुरोगामीत्व
कधीच गळून पडलय
जात नावाच्या उकिरड्यात
आता तर माणसांच्या अस्थितही
जातीने ठेकेदारी मिळवली.
SANJAY L BANSODE
9819444028

स्वप्नात तुझा मी

स्वप्नात तुझा मी, चेहरा चाळत होतो
तुझ्या सुंदरतेवरी, तेंव्हाच भाळत होतो !
विसरलो ते वैरी,ज्यांनी घायाळ मज केले
उबदार तुझ्या नयनांनी,जखमांना वाळत होतो !
असले जरी माझे, जीवन काट्यांवरचे
प्रेमाच्या चाळणीने, ते काटे चाळत होतो !
हरवले होते मन, त्या वेदनेच्या धुक्यातं
धुक्यातून सावरताना,तुलाच न्याहळत होतो !
कोण जाने कसा हा,जीव तुझ्यावर जडला
प्रेमाची फुले तुझ्या त्या,केसावरी माळत होतो !
SANJAY L. BANSODE
9819444028

मन

श्वास श्वासात राहीना,मन गुंतले असे ते
अलगद काळजावर,उमटले प्रेमाचे ठसे ते 


माझा मी न राहिलो,सांगू कुणास आता ?
गर्दीने गजबजलेले,गाव कुठे वसे ते ?


मी भाळलो तुझ्या त्या, थोड्याशा बोलण्याने
हसऱ्या तुझ्या त्या गालावरी, नकळत फसे ते 


मन मनास बोले, तु होशील का माझी ?
ना ऐकताच मन, मनावरीच  रूसे ते 


झाले कसे असे हे,मलाही कळले नाही
पापणी मिटताच डोळे,तुझ्या प्रेमात  घुसे ते


Sanjay L Bansode 9819444028

थोतांड थाप

शेंदूर फासलेल्या दगडाला
मी कधीच वाहिली
तिलांजली.
पण मुर्दाड झालेल्या मेंदूतून
उगवतात रोजच
नवनवीन देव.
कदाचीत त्यांना त्यांचा
तेहेतिस कोटीचा आकडा
पूर्ण करायचा असेल.
महानिद्र झालेला खविस
आजही थैमान घालतोय
रात्रीच्या अंधारात.
आणि
नकळत डोक्यातून उगवतो
एक देव.
हा महाभूताचा चमत्कार म्हणावा
का धर्माने मस्तकीं मारलेली
थोतांड थाप.
संजय एल बनसोडे

गांडू नशीब

सालं आपलं नशीबच गांडू
झाटभर पगारासाठी
दिवसभर जिरवावी लागते.....
इन्क्रिमेन्टची अवस्था
त्या पान्हा चोरणाऱ्या म्हशीगत झाली
कितीही पाणी लावून पीळले
तरीही तांब्या रिकामाच.....
कामगारांचा बळी घेत
बॉस रोजच साजरी करतो
बकरी ईद.....
बस आणि लोकलला
वटवाघळा सारखे लटकून
मोकळा होतो न होतो,
थेट रांगेत उभा ठाकतो
राशनच्या....
तिकिटाच्या...
मॉलच्या .....
हॉस्पिटलच्या ......
बाथरूमच्या....
शेवटी
मरणाच्या.......
सालं, सारं जीवन "वेट....र " बनलय ...
संजय एल बनसोडे

मलाही वाटतं,तुझ्यावर लिहावं

मलाही वाटतं,तुझ्यावर लिहावं
तुझ्या ओठावर
तुझ्या नयनावर
तुझ्या केसांवर
तुझ्या गालावर
हसऱ्या चेहऱ्यावर
तुझ्या चालण्यावर
तुझ्या बोलण्यावर
पण काय लिहावं ?????
मला सद्ध्या काल्पनिक लिखाण जमतच नाही.
मी हल्ली भावनिकच होत चाललोय
आणि हळूहळू
मनातील भावना कागदावर उमटू लागल्यात
मंग त्या विद्रोहाच्या असो का प्रेमाच्या.
खरे तर प्रेम आणि माझा
दूरदूर पर्यंत संबध नाही.
पण का,कोण जाने
मी हळूहळू प्रेमाजवळ चाललोय.
का ?
कुणाच्या ?
कशासाठी ?
हे मलाही माहीत नाही.
पण ह्रुदयातल्या
प्रेम नावाच्या वाळलेल्या झाडाला
पुन्हा नवीन पालवी फुटत आहे
हे मात्र नक्की.
पुन्हा वसंत बहरू पाहतय
तु येशील ना !
माझ्या बहरलेल्या वसंतात
मोर होऊन नाचायला ?
संजय बनसोडे

बा भीमा.......

तूच दिला थारा तूच दिला चारा सोसाट्याचा मारा परि तुझाच सहारा ॥ जातिवाद दाट होता लई बाट अंधाराची वाट परि मुखी तुझा नारा ॥ तुझच हे देणं...